लातूर : पावसाळ्यात उदगीर जळकोट ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले असुन ते तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश ना. संजय बनसोडे यांनी दिले.
उदगीर जळकोट तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, विभागातील विविध विकास कामासंदर्भात लातूर येथील विश्रांमग्रहात बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
याबैठकीला सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता एम एम पाटील, उपअभियंता एल. डी. देवकर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता लवटे (मुख्यमंत्री सडक योजना), प्रधानमंत्री गाव सडक योजनाचे कार्यकारी अभियंता मुकादम,
जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभिंयता म्हात्रे, कार्यकारी अभियंता रोहित जगताप, यासोबतच उदगीर पंचायत समितीचे सभापती प्रा.शिवाजी मुळे, उदगीरचे नगरसेवक ताहेरभाई सय्यद, मंजुर पठाण इत्यादी उपस्थित होते.
यावेळी उदगीर व जळकोट शहरात सुरू असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
यात उदगीर येथील प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, बौध्द विहार, शादीखाना, लिंगायत भवन जळकोट येथील प्रशासकीय इमारत अशा विकास कामाचा आढावा घेण्यात आला.
ही कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण विहीत मुदतीत करण्यात यावीत तसेच मलकापुर येथील रेल्वे उड्डाणपूल बाबत तांत्रिक मान्यता घेण्यात यावी अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकक्षात येणारे खराब झालेले रस्ते जे दोषदायित्व कालावधीत आहेत ते त्वरित संबंधित एजन्सी मार्फत दुरुस्त करण्यात यावे असे निर्देशही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
उदगीर मतदार संघातील जलसंपदा विभागाअंतर्गत असणाऱ्या प्रकल्पाच्या सिंचन व्यवस्थापन तथा दुरुस्ती बाबत सविस्तर आढावा मा. राज्यमंत्री यांनी घेतला.
तिरु मध्यम प्रकल्प १००% भरले असल्याने त्वरित पाणी मागणी अर्ज मागविण्यात यावे व कालवा सल्लागार समितीच्या परवानगीने रब्बी सिंचनाचे नियोजन करण्याचे आदेशही यावेळी दिले.
सिंचनाकरिता आवश्यक कालवा दुरुस्तीचे कामे त्वरित करावीत तसेच तिरु प्रकल्पाच्या कालवा विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव तसेच बंद पाईपलाईन व वितरण प्रणाली (PDN) द्वारे सिंचन करण्याचा प्रस्ताव यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
हा प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे राज्यमंत्री यांनी निर्देश दिले. याबाबत अधीक्षक अभियंता यांनी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून संकल्पन पुढील आठवड्यात सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
जवळपास सर्व प्रकल्प १००% भरले असल्याने, रब्बी तथा उन्हाळी सिंचन योजना प्रभावी पद्धतीने राबविण्यात यावे व त्याकरिता आवश्यक सर्व बाबींचे अंदाजपत्रक तयार करून कामे हाती घेण्यात यावीत असे निर्देश देण्यात आले.
तिरु नदीच्या निळी व लाल रेषा लेखणीचा प्रस्ताव त्वरित मंजूरी घेऊन पूर संरक्षक भिंत बांधकामची निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.