मुंबई : दुरसंचार कंपनी असलेल्या भारती एअरटेलच्या (Bharti Airtel) प्रिपेड ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशाती दुसरी सर्वात मोठी कंपनी असलेल्या भारती एअरटेलने आपल्या विविध प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या 26 नोव्हेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. नव्या दरानुसार जवळपास सर्वच प्लॅनमध्ये 25 टक्क्यांची वाढ होणार आहे. याचा मोठा फटका ग्राहकांना बसू शकतो.
प्रति ग्राहक 300 रुपये मिळकतीचे उद्दिष्ट
याबाबत बोलताना कंपनीने म्हटले आहे की, प्रति ग्राहकामागे सरासरी 200 रुपये प्राप्तीचे उद्दिष्ठ सुरुवातीला कंपनीकडून ठेवण्यात आले होते. मात्र आता त्यामध्ये बदल करून ते 300 रुपये एवढे करण्यात आले आहे.
त्यामुळे आता प्रिपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. प्लॅनच्या किमतीमध्ये 25 टक्के वाढ होणार असून, येत्या 26 नोव्हेंबरपासून नवे दर लागू केले जातील. मिळालेल्या पैशांमधून आम्हाला आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारची सेवा देण्यास मदत होणार असल्याचेही कंपनी म्हटले आहे.
अनलिमिटेड प्लॅनच्या दरांमध्ये वाढ
कंपनीने सर्वच अनलिमिटेड प्लॅनच्या दरांमध्ये वाढ केली आहे. अनलिमिटेड प्लॅनचे दर 20 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. तर 28 दिवसांची मुदत असलेल्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये वाढ करून तो आता 99 रुपये करण्यात आला आहे.
तसेच 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये वाढ करून तो 179 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच 219 रुपयांच्या प्लॅनसाठी आता 265 रुपये मोजावे लागणार आहेत. कंपनीने केल्या या अचानक दरवाढीमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ बसण्याची शक्याता आहे.