मुंबई : 57 वर्षीय प्रियकराचा खून केल्या प्रकरणी मुंबईत 70 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे.
बुधवारी वडाळ्यातील त्यांच्या राहत्या घरात हे हत्याकांड घडले होते. रागाच्या भरात हातोड्याने वार करुन वृद्धेने प्रियकराचा खून केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
70 वर्षीय शांती पाल आणि 57 वर्षीय बिमल खन्ना यांचे प्रेमसंबंध होते. मात्र शांती पाल यांच्या पहिल्या विवाहातून झालेल्या मुलीशी बिमल खन्ना याने लग्न केल्यामुळे शांती यांचा संताप झाला होता. खन्नाने आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले, या भावनेतून शांती पाल यांच्या संतापाचा पारा चढला होता.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी रात्री उशिरा बिमल खन्ना घरी आला असता त्याचे शांती पाल यांच्याशी भांडण झाले. रागाच्या भरात त्यांनी प्रियकराच्या डोक्यावर हातोड्याने वार केले, अशी माहिती वडाळा टीटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शैलेश पासलवार यांनी दिली. ब्रेन स्ट्रोकवर औषधोपचार सुरु असलेले खन्ना या हल्ल्यानंतर बेशुद्ध पडले.
35 हून अधिक वर्षांचा सहवास
पोलिसांनी सांगितले की शांती पाल आणि त्यांची मुलगी 1984 च्या दंगलीनंतर पंजाबमधून मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी त्यांची भेट बिमल खन्ना यांच्याशी झाली. त्यांनी मायलेकींना आश्रय दिला होता. पाल आणि खन्ना एकत्र राहत होते. या नात्यातून त्यांना एक मुलगीही झाली आहे.
नात्यांचा गुंता
दरम्यान, बिमल खन्ना यांनी शांती पाल यांच्या पहिल्या लग्नातून झालेल्या मुलीशी लग्न केले. या नात्यांच्या गुंत्यामुळे शांती पाल भडकल्या होत्या. भांडणानंतर संतापाच्या भरात त्यांनी खन्नांवर हातोड्याने वार केल्याचा आरोप केला जात आहे.
रुग्णालयात खोटी माहिती
बुधवारी शांती पाल यांनी खन्ना यांना सायन रुग्णालयात नेले आणि डॉक्टरांना ते घरात कोसळल्याचे सांगितले. मात्र शव विच्छेदनात उघड झाले की खन्ना यांचा मृत्यू पडल्यामुळे, वार किंवा हल्ल्याने झालेल्या शारीरिक आघातामुळे झाला.
रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी शांती पाल यांना ताब्यात घेतले. अखेर पाल यांनी हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.